नागपूर : क्रांतिदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे नऊ ऑगस्टला राज्यस्तरीय समरगीत, स्फूर्तिगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
हा कार्यक्रम राजेरघुजीनगर येथील कामगार कल्याण भवनात झाला. यात नागपूरसह मुंबईतील नायगाव, अंधेरी, वरळी, ठाणे, चिपळूण, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, जळगाव, अकोला, अमरावती, चंद्रपूर, औरंगाबाद, नांदेड, लातूर येथून सुमारे २०० कलावंत सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन परीक्षकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. दिवसभर चाललेल्या या स्पर्धेत एकापेक्षा एक सरस समरगीते आणि स्फूर्तिगीते सादर करण्यात आली. यानंतर बक्षीस वितरण सोहळा पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत राज्याचे कल्याण आयुक्त सतीश दाभाडे यांनी केले. त्यांनी स्पर्धा आयोजनामागची मंडळाची भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नागपूर महापालिकेचे दीपराज पार्डीकर यांनी भूषविले. बाहेरून आलेल्या स्पर्धकांचे महापालिकेतर्फे स्वागत करून त्यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी नागपूर महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्रीपाद अपराजित यांची विशेष उपस्थिती लाभली. उपस्थित कलावंतांना त्यांनी मार्गदर्शन केले. प्रा. अनिलकुमार खोब्रागडे, सुनील वाघमारे, संपदा तुंबडे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. या वेळी खोब्रागडे व वाघमारे यांनी कलावंत संघांना सादरीकरण अधिक उत्कृष्टपणे कसे करता येईल याबद्दल बारकाव्यांसह मार्गदर्शन केले. यानंतर जाहीर करण्यात आलेल्या निकालात चंद्रपूर गट कार्यालयाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना पाच हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. अमरावती गट कार्यालयाने द्वितीय, तर अंधेरी गट कार्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला. त्यांना अनुक्रमे तीन हजार आणि दोन हजार ५०० रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. गट कार्यालय नायगाव आणि गट कार्यालय क्रमांक एक नागपूर यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचे उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक, चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सीमा सराफ यांनी सूत्रसंचालन केले. कामगार विकास अधिकारी अरूण कापसे यांनी आभार मानले. या वेळी विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. राष्ट्रगीताने स्पर्धेचा समारोप करण्यात आला. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी कामगार कल्याण मंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.